Saturday, January 7, 2017

क्षमतांची कसोटी पाहणारी शर्यत...मॅरेथॉन

शारीरिक क्षमतेेबरोबरच मानसिक क्षमता,संयम यांची कसोटी बघणारी एकमेव स्पर्धा म्हणजे मॅरेथॉन शर्यत होय. आज (दि.८) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ही जिल्ह्यातील नावजलेली शैक्षणिक संस्था चौथी राष्ट्रिय आणि नववी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करीत आहे. त्यानिमित्त मॅरेथॉनचा इतिहास,जागतिक तसेच देशांतर्गत होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा आणि राष्ट्रीय विक्रम यांचा घेतलेला थोडक्यात आढावा...

कुठल्याही गावाच्या नावाने एखाद्या क्रीड़ा प्रकाराचा जन्म होणे ही फारच दुर्मिळ गोष्ट आहे. मॅरेथॉन हां असाच दुर्मिळ क्रीड़ाप्रकार आहे. मॅरेथॉनचा इतिहास जाणून घेण्यासाठी प्राचीन काळात इसवी सन् काळात डोकवावे लागेल. इसवी सन पूर्व ४९०मध्ये ग्रीस आणि पर्शिया ही दोन पारंपरिक आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रे होती. राजेशाही असल्याकारणाने युद्धे ही नेहमीचीच बाब झालेली. असेच एक मोठे युद्ध त्या काळी ग्रीस मधील एका टेकडीवर झाले. त्या टेकडीचे नाव मॅरेथॉन. या युद्धात पर्शियाचा पूर्णपणे पाडाव होऊन ग्रीसचा विजय झाला. ही विजयी वार्ता राजवाड्यात राजापर्यन्त पोहचविण्याची जबाबदारी 'फिडिफिड्स' या योध्याने आपल्या खांद्यावर घेतली. तब्बल २५ मैल दौड़ घेऊन या जिद्दी योध्याने ती बातमी राजदरबारात 'निकी' म्हणजे 'विजयी वार्ता'देऊन जागीच कोसळला आणि गतप्राण झाला. ग्रीस लोकांच्या मनात विजयाबरोबर या अजिंक्य योध्याने जागा मिळविली. अशी ही हृदयस्पर्शी,भावनाशील घटना ग्रीस लोकांच्या मनात खोलवर रुजली. या कथेला पिढ्यानपिढ्या शौर्यगाथा म्हणून सांगितले जाऊ लागले.

सन् १८९६ मध्ये पहिल्यावहिल्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये लोकांच्या अभिमानी ऐतिहासिक कथेचे ग्रीकवासियांच्या दृष्टीने असलेले महत्व लक्षात घेऊन ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी मॅरेथॉन पठार ते ऑलिम्पिक क्रीडानगरीपर्यन्त धावणे अशी सूचना प्रा. मायकेल ब्रीअर्ली यांनी मांडली आणि सर्वानुमते तीला संमति देऊन त्याची अंमलबजावणीही केली. तेव्हापासून'फिडिफिड्स' या योध्याला मानवंदना म्हणून ही शर्यत ठेवली जाते आणि हि स्पर्धा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणारे प्रा.ब्रिअर्ली याना या शर्यतीचा जनक असे सम्बोधले जाऊ लागले.

या शर्यत ४२.१९५ किमी अशा विचित्र अंतराची आहे आणि विशेष म्हणजे हे अंतर देखील मान्यताप्राप्त असे आहे. या विचित्र अंतराची कहाणी देखील मजेशीर आहे. सन १९०८ लंडन ऑलिम्पिकमध्ये या शर्यतीचा शेवट इंग्लंडच्या राजघराण्यातील सदस्यांना बघता यावा याकरिता या अंतरात वाढ करण्यात आली. त्यामुळे या शर्यतीचा रोमांचकारी अंतिम क्षण राजगृहाजवळच झाल्याने राजगृहातील सदस्यांना याचा आनंद घेता आला. म्हणून या स्पर्धेचे अंतर ४२.१९५किमी झाले. १९२१ पासून या स्पर्धेचे हेच अंतर आंतरराष्ट्रिय ऑलिम्पिक संघटनेकडून अधिकृत करण्यात आले. यासाठी आयएएफ ने प्रस्तुत प्रसंगाचा आधार घेतला.

जगामध्ये फार प्रतिष्ठेची अशी ही मॅरेथॉन शर्यत १०० पेक्षा जास्त ठिकाणी दरवर्षी भरविली जाते. यामध्ये सहारा मॅरेथॉन,अंटार्टिका मॅरेथॉन, बोस्टन मॅरेथॉन, लंडन मॅरेथॉन, बर्लिन मॅरेथॉन, टोकियो मॅरेथॉन,न्यू यॉर्क मॅरेथॉन त्याचबरोबर भारतामध्ये देखील सध्या बऱ्याच मोठ्या शहरात ही शर्यत आयोजित केली जाते. यामध्ये बंगळुरु, कोलकाता, पुणे, मुंबई,अहमदाबाद, ठाणे, चैन्नई आणि मविप्र मॅरेथॉन नाशिक.

जागतिक स्तरावरील बोस्टन मॅरेथॉन सर्वात जूनी म्हणजे १८९७ पासून चालत आलेली तर जर्मनिमधील गुरबर्ग मॅरेथॉन ही रात्रीच्या वेळी भरविण्यात येणारी मॅरेथॉन आहे. भारतामध्ये मॅरेथॉन शर्यतीची सर्वप्रथम चाचणी १९२० मध्ये घेण्यात आली तर आंतरराष्ट्रिय शर्यतीचा श्रीगणेशा दिनांक २५ सप्टेंबर १९७३ रोजी पुण्यामध्ये झाला. आपल्या देशातील'स्टॅन्डर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन' तसेच 'पुणे मॅरेथॉन' या आंतरराष्ट्रिय मॅरेथॉन शर्यती म्हणून ओळखल्या जातात. मुम्बई मॅरेथॉन शर्यतीला 'मॅरेथॉन असोसिएशन ऑफ़ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड रोड रेसेस' या आंतरराष्ट्रिय संघटनेने 'गोल्डन लेवल रेस'असा दर्जा दिलेला आहे.

भारताने १९२० च्या अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये पी.एफ. चौघुले यांच्या रूपाने मॅरेथॉन मध्ये प्रवेश केला. तसेच २०१६ च्या रियो ऑलिम्पिक मध्ये कविता राऊत-तुंगार यांनी ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. भारताचा राष्ट्रिय मॅरेथॉन शर्यत विक्रम शिवनाथ सिंह यांच्या नावावर असून त्यांनी २ तास ११ मिनिटे १५ सेकंद या वेळेत ही शर्यत पार केली.

उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या मविप्र ने २००९ पासून या शर्यतीचे आयोजन करण्यास सुरुवात केली. समाजात आरोग्यविषयी सजगता निर्माण व्हावी, एक आरोग्यसंपन्न सुदृढ़ समाज निर्माण व्हावा या उद्देशाने स्व.वसंत पवार यांनी ही स्पर्धा सुरु केली. स्व. पवार यांनी या स्पर्धेची सर्व जबाबदारी तत्कालीन शालेय क्रीडा शिक्षक आणि सध्या संस्थेचे क्रीडाधिकारी प्रा.हेमंत पाटील यांच्यावर सोपविली. प्रा.पाटील यांनी देखील या जबाबदारीकडे एक संधी म्हणून बघितले. आणि त्याचमुळे दरवर्षी सांघिक कामाचे उत्तम उदाहरण म्हणून या स्पर्धेकडे बघता येईल असे नियोजन करून हि स्पर्धा यशस्वी केली जाते. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सध्या संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय नीलिमाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन केलेले असते. Run For Health and Build The Nation हे ब्रीदवाक्य घेऊन ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय आयोजनासाठी मार्गक्रमण करीत आहे.

या शर्यतीची पारदर्शकता जाणून घेण्यासाठी आर.एफ.आय.डी. या संगणकीय चीप चा वापर केला जातो. त्या चीपचा आणि खेळाडूंचा बिब क्रमांक सारखाच् असतो. जेथून स्पर्धा सुरु होते त्या ठिकाणी रबर मॅट बसविन्यात आलेली असते. त्यामुळे शर्यत सुरु झाल्यानंतर शेकडो धावपटु एकाच वेळी धावण्यास सुरुवात करतात. खेळाडूंच्या बुटाचा आणि मॅटचा स्पर्श झाल्यास खेळाडूंच्या वेळेची सुरुवात होते आणि पुन्हा अंतिम क्षणी खेळाडूंचा आणि मॅटचा स्पर्श झाल्यास आपोआप वेळ थांबते. ही चीप पुरुष फूल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन तसेच महिला हाफ मॅरेथॉन यांसाठी वापरली जाते. दोन वर्षांपासून दाट धुके असलेला हा सरळसरळ मार्ग नवोदीत खेळाडूंना आकर्षित करत आहे. या वर्षी या स्पर्धेत एकुण ७ लाख ४४ हजार इतक्या रकमेची रोख परितोषिके देण्यात येणार आहे.
रियो ऑलिम्पिक मॅरेथॉन शर्यतीमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या नाशिकच्या खेळाडू कविता राऊत-तुंगार, देशांतर्गत अनेक स्पर्धा गाजविणाऱ्या मोनिका आथरे, दुर्गा देवरे, अंजना ठमके, किसन तडवी, दत्ता बोरसे, संजीवनी जाधव यांच्यासारख्या खेळाडूंचा पाया खऱ्या अर्थाने मविप्र मॅरेथॉन ने घातला. नाशिक ही संतांची भूमी, यंत्रभूमी, तंत्रभूमी याबरोबरच मविपर मॅरेथॉन, नाशिक रन यांसारख्या स्पर्धांमुळे क्रीड़ाभूमी म्हणून नाशिक शहराने आपली ओळख अधिक ठळक केलेली आहे.


वैभव सुरेश कातकाडे
९५९५६९८७५९

No comments:

Post a Comment

पृथ्वी, मास्क, वजीर आणि बरंच काही...

Photo Credit : Priyanka Ghogare हा तुम्हाला ग्राफिक्स फोटो वाटतोय का ? वाटत असेल तर मग तुम्ही चुकलात, हा आहे आप...